विशेष प्रतिनिधी – अनिल वाघेला
मुंबई: मुंबई – बडोदा एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या भिवंडी-वाडा रोड (SH-35) व सुपेगाव-लामज येथील रॅम्प्स आणि जोड रस्त्यांच्या सुधारित खर्चास त्वरित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. दिल्लीत झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले.भारतमाला परियोजना (टप्पा-२) अंतर्गत विकसित होत असलेल्या आठ-पदरी प्रवेश-नियंत्रित (Access-controlled) वडोदरा-मुंबई लिंक एक्स्प्रेसवेच्या (अकलोली-आमने विभाग, पॅकेज XV) अंतर्गत हा प्रकल्प समाविष्ट आहे.

- महत्त्वाचे टप्पे: भिवंडी-वाडा रोड आणि वडोदरा-मुंबई लिंक एक्स्प्रेसवे दरम्यान (किमी ३१+३१३) तसेच किमी ३१+४९० ते ३२+७०० (सुपेगाव-लामज) यादरम्यान हे जोड रस्ते आणि प्रवेश-निर्गमन रॅम्प्स (Entry & Exit ramps) तयार केले जाणार आहेत.
“या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पालघर जिल्ह्यातील दळणवळणाला नवी गती मिळेल आणि स्थानिकांना राष्ट्रीय महामार्गाचे थेट जाळे उपलब्ध होईल.” — डॉ. हेमंत सवरा, खासदार (पालघर)
- थेट कनेक्टिव्हिटी: भिवंडी-वाडा रस्ता आणि वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवे यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होईल.
- वेळ व सुरक्षितता: प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटून रस्ते सुरक्षेत मोठी वाढ होईल.
- व्यापार व कृषी वृद्धी: कृषी उत्पादने आणि औद्योगिक मालाची वाहतूक जलद व सोपी होणार असून भिवंडी, सुपेगाव, लामज, अंबाडी व परिसरातील ग्रामीण व औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
सध्या या प्रकल्पाचा सुधारित खर्च अंदाज अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पालघर जिल्हा आणि लगतच्या भागातील जनतेचे व्यापक हित लक्षात घेता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात वैयक्तिक लक्ष घालून सुधारित खर्चास तातडीने मंजुरी द्यावी, जेणेकरून रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी विनंती खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे.
