
- विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात वाढदिवस साजरा; लोकप्रतिनिधी आणि माध्यम क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
- शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि पत्रकार सुरक्षेवर अनौपचारिक मंथन
घनश्याम आंबोकर , मिरा-भाईंदर, २ जुलै:
बदलत्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्यासाठी आणि पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधी व समाजाने माध्यम क्षेत्राच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, हाच संदेश देणारा एक सकारात्मक सोहळा आज मिरा-भाईंदरमध्ये संपन्न झाला. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ क्राईम पत्रकार सुभाष पांडे यांचा वाढदिवस आज शहराच्या विरोधी पक्षनेत्या सैय्यद अफरीन हुसैन यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात अत्यंत सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. गेली ३० वर्षे सातत्याने निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराची राजकीय आणि सामाजिक वर्तुळाकडून घेतलेली ही दखल माध्यम जगताचे मनोबल वाढवणारी ठरली आहे.
या विशेष कार्यक्रमाला मिरा-भाईंदरमधील राजकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये ‘आपका शहर’चे संपादक ओ. पी. सिंग, वृत्तनिवेदिका दीपा सिंग, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष व पत्रकार घनश्याम आंबोकर, ‘प्रसिद्धी लेखन’चे संपादक शेषमनी यादव, नगरसेविका दीप्ती भट्ट, विरोधी पक्षनेत्या अफरीन हुसैन यांच्या आजी व पूर्व उपमहापौर सैय्यद नूरजहाँ हुसैन, सामाजिक कार्यकर्ते व पूर्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आणि काँग्रेस प्रवक्ता रवी खरात आदींचा प्रामुख्याने समावेश होता. उपस्थित सर्वच मान्यवरांनी पांडे यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
जोखीम पत्करणारी पत्रकारिता नव्या पिढीसाठी मार्गदर्शक: अफरीन हुसैन
या सोहळ्याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेत्या अफरीन हुसैन यांनी सुभाष पांडे यांच्या प्रदीर्घ प्रवासाचे कौतुक केले.
”क्राईम पत्रकारिता हे अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे क्षेत्र आहे. अशा क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे आणि तत्त्वांशी तडजोड न करता काम करणे ही कौतुकास्पद बाब आहे. समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना वाचा फोडण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी सुभाष पांडे यांनी अनेकदा स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करली. त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव आणि कार्यपद्धती आजच्या नव्या पिढीतील पत्रकारांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल,” असे मत हुसैन यांनी व्यक्त केले.
प्रशासन आणि पत्रकारांच्या समन्वयातून जनप्रश्न सुटावेत: सुभाष पांडे
आपल्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार सुभाष पांडे यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
”पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. आज विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात पत्रकार आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन माझा वाढदिवस साजरा करत आहेत, हा वैयक्तिक माझा नसून संपूर्ण पत्रकारितेचा सन्मान आहे. आजच्या आव्हानात्मक काळात लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न थेट मार्गी लावण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी समन्वय ठेवून काम करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन पांडे यांनी केले.
पत्रकार सुरक्षिततेवर सकारात्मक चर्चा
केवळ कौतुक सोहळ्यापुरता मर्यादित न राहता, या कार्यक्रमाला एका विचारमंचाचे स्वरूप प्राप्त झाले होते. केक कापल्यानंतर उपस्थित मान्यवरांमध्ये शहरातील सद्यस्थितीतील कायदा-सुव्यवस्था, पत्रकारांची वाढती असुरक्षितता आणि विविध सामाजिक प्रश्नांवर अत्यंत सकारात्मक अशी अनौपचारिक चर्चा झाली. पत्रकारांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी लोकप्रतिनिधी आणि समाजाने एकत्र येऊन भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित पत्रकारांनी यावेळी मांडले.
मिरा-भाईंदरमधील हा सोहळा पत्रकार आणि लोकप्रतिनिधींमधील सकारात्मक समन्वयाचे एक उत्तम उदाहरण म्हणून समोर आला आहे.

